Tuesday, September 23, 2014

अन्न हे पूर्णब्रह्म !!

1988 चा मे महीना , 
नेपाळमधल्या पोखरा व्हॅली ट्रेकचा दुसरा दिवस, 
शेड्यूल प्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी 2 वाजताच पोचलो आणि ग्रुपलिडर म्हणाला दिवस मोठा आहे, अजून पुढच्या गावात मुक्काम करू.... 
निघालो आणि पावसाला सुरूवात झाली ... 
4.30/5.00 वाजता पुढच्या नदी काठावर गावाच्या खुणा दिसू लागल्या आणि हूश्श वाटलं.....
 पण कसलं काय ? 87मधल्या पावसाळ्यात पुर आल्यावर सरकार ने सगळी वस्ती ऊठवली होती... शिल्लक होते फक्त मोडके चौथरे... 
परत सॅक पाठीवर मारून पुढच्या गावाच्या रस्त्याला लागलो ... 
रात्री 8.30च्या दरम्यान छोटी वस्ती लागली, तिथे चौकशी केली तर ट्रेक हटस् ( ट्रेकर्सच्या मुक्कामाची सोय) असलेलं गाव अजून 2 तासांनी आहे, ताकद आणि तयारी कोणाचीच नव्हती, मग याच वस्तीत मुक्काम करावा असं ठरलं, तर कोणीही जागा देइना, पावसाची रिपरिप, आतपर्यंत भिजलेले कपडे, घोट्या पर्यंत चिखलात जड झालेले हंटर्स, आणि गारठलेले पाय घेऊन 16 जण थंडीत कुडकुडत ऊभे.. पोटात आग पडलेली.... 9.00 - सव्वा नऊ म्हणजे गावात अपरात्र .. 
पाऊस वाढल्यावर मी एका घराच्या पडवीत जाऊन ऊभा राहीलो आणि आतून त्या घराच्या लक्ष्मीचा चढलेला आवाज आला 'कौन है.... 
 मी (वय वर्षे 15,) आणखी कुडकुडत म्हणालो..''दिदी थंड है...बुखार आएगा '' दार थोडं किलकिलं झालं ... बाई दरवाजात आली माझ्याकडे न बघता परत गेली आणि मी आत गेलो... ती ' राक्षी ' ( तांदूळाची बनवलेली घरगुती दारू) पित बसली होती, नवरा चुलीशी होता... असो..
ऊंटाला अरबाच्या तंबूत प्रवेश मिळाला होता !!
10 मिनिटं झाली आणि माझी 'तब्येत' बघायला बिनाताई आत आली, दिदीचा आवाज परत चढला, पण पाकीट काढल्यावर मग रात्री निदान 4 मुलींना आत घेण्याची मांडवली झाली ... 5 जणं शेकोटीशी बसलो..
अजून एक ग्लास संपल्यावर तिनंच विचारलं ...खाना खाया ? नही ..खाओगे ?? हां .
मेन्यू आणि रेट ठरवायला आजून दोघे आत आले...शेकोटीत दोन नवी लाकडं सारली... 
सिर्फ डाल चावल मिलेगा .. मेन्यू फायनल झाल्या वर तिने नवीन बाटली काढली, नवर्.याला सांगून उरलेल्या लोकांची रहायची व्यवस्था दुसरी कडे केली, पैसे मात्र कनवटीला लावले आणि बैठक मारून बसली... मी आणि नारायण (तिचा नवरा) पोटमाळ्यावरून फ्लॉवर बटाटे घेऊन ऊतरलो...हिने चार बटाटे ठेवून ऊरलेले परत बसल्या जागेवरून माळ्यावर भिरकावले... तांदूळ रेशनिंग करून झालं... नवरा तिला हळू बोलायला सांगत चूल फूंकत होता..मोठ्या पातेल्यात भात शिजत होता... तिने बैठकीखालून सुरा काढून फ्लॉवर कापायला घेतला... 4 बटाटे, पानं, देठं आणि नावाला थोडा फ्लॉवर साकटून पातेल्यात.....ऊरलेला परत माळ्यावर! !!
11.00 - 11.30 च्या दरम्यान सगळं प्रकरण निट रटरटलं ...अचानक परत तिचा आवाज चढला.. नारायण ने लोणचं काढलं होतं.. तिला न जुमानता वाढलं पण.... 
लोणचं .... आणि फ्लॉवर बटाट्याचं भाताबरोबर शिजवलेलं ते रसायन...
आहाहा... 
त्या दिवसापासून 'अन्न हे पुर्णब्रह्म' हे स्वतःच्या मनावर ठसवलं आहे !! 
...त्रिविक्रम शेंड्ये
( १९ ऑगस्ट २०१४ )

Thursday, September 18, 2014

एक दरोडा...... माणुसकी वर पडलेला !!

संध्याकाळी ए बी पी माझा वर "शामराव कोकरे" या धनगराचं घर लुटल्याची बातमी बघितली, त्याच्या झोपडीची दुरावस्था बघितली आणि माणसाच्या नीचपणाची किळस आली, 
वासोट्याच्या जंगलात गेली अनेक वर्ष एकटा 'झोपडी ठोकून रहाणारा शामराव आठवला, 
"ए पोरानो .... ह्या वाड्याशी न थांबता कुठं निघालात? वाईच बुड टेका, ताक प्या , मग दावतो 'सरीची वाट'.... 
असं प्रेमाने दरडावून सांगणारा शामराव आम्हा ट्रेकर्स चा आधार ! 
वासोटा हे वनविभागाकडून आरक्षित जंगल म्हणून जाहीर झाल्यावर ह्या गावातली बाकीची सर्व वस्ती उठून सातारा जिल्हातल्या दुसऱ्या ठिकाणी गेली, पण टणका शामराव काही हालंला नाही...
 "बापजाद्यांपासून राहिलो ते ठिकाण नाही सोडणार" असं सरळ सांगून त्याच रानात झोपडी ठोकून राहिला, झोपडी कसली, मोठ्ठा मांडवच ! सोबतीला बायको आणि तीन चार मुलं, बाकीची ३ /४ नोकरी निमित्ताने बाहेर... ..
शेजारीच ७० - ८० गुरं मावतील असा मोठा गोठा, कुडाच्या- शेणानं सारवलेल्या भिंती, सगळीकडे जाणवणारा शेणां-मुताचा वास....
बसायला पसरलेलं घोंगडं.. आणि प्रसन्नपणे समोर आणून ठेवलेली ताकाची मोठ्ठी घागर !! हो ... घागर !! ती मात्र चकचकीत स्टेनलेस स्टीलची .. 
प्या पोटभर.. लागलं तर आणखी हाय असं सांगणारा दिलदार शामराव !! 
ट्रेक संपत आलाय म्हणून उरलेला डाळ तांदुळाचा शिधा दिला तर घेणारा, पण ''पोरानो.. असतील तेवढ्या सगळ्या "माचीस" मला द्या, नायतर चूल पेटवायला चोरवण्यापर्यंत जावं लागंल" असं हक्कानं काड्यापेटी मागून घेणारा शामराव... 
७० -८० गुरं हायेत, एखादं दोन तीन दिवस नाही आलं परत, की समजतो वाघरांनं नेलं" असं सहजतेनं सांगणारा शामराव...
 चोरवण्यात पोचल्यावर एखाद्या ग्रुप ने ठरलेले पैसे नाही दिले तर अंगातली बंडी वर करून 'ह्या पोटाला काय घालू रे पोरां ... " असं म्हणून खपाटीला गेलेलं पोट दाखवणारा रोखठोक शामराव... 
काय मिळालं असेल त्याच्या झोपड्यात चोरी करून ?
नागेश्वर - वासोटा करून कोकणात उतरणांर्`यांचा  वाटाड्या म्हणून शामराव काम करतो, 
कठीण पण जवळच्या अशा वाटा त्याच्या पायाखालच्या.. जिल्हा सातारा असला तरी तिथून चिपळूण बाजारासाठी जवळ, म्हणून 'रेशन' साठी चिपळूण गाठणारा शामराव येताना घरचं लोणी घेऊन उतरतो, ते आधी "ऑर्डर" घेतली असते त्याला देण्यासाठी... 
जाताना आठवडा- पंधरा दिवसाचं रेशन आणि पुढच्या लोण्याच्या ऑर्डर .. हाच चरितार्थ... 
चिपळूण - चोरवणे बस वर आधी निरोप पाठवला तर ट्रेकर्सनां वाटाड्या म्हणून येणारा शामराव सगळ्या जंगलाचा राखणदार आहे, कोण कुठे काय तोड करतंय.. कोणत्या बाजूला जंगलतोड करणार्'यांनी गाडी रस्ता बनवलाय...अश्या बातम्या फॉरेस्ट ऑफिसरला पोचवणाऱ्या शामरावच्या झोपडीवर कोणी डल्ला मारला असेल ?
एवढ्या निर्जन ठिकाणी... जिथे जायला ( घाटावरून किंवा कोकणातून .. ) निदान ४ / ५ तास चालावं लागतं .. अश्या ठिकाणी कोणी नासधूस केली असेल ? जंगलतोड करणाऱ्या ठेकेदाराने ? ट्रेकिंगच्या नावाखाली हैदोस घालणाऱ्या एखाद्या ग्रुपने ?
कोणीही असेल पण ह्या प्रकाराने जंगलात शिल्लक असलेल्या माणुसकीवर हल्ला झालाय हे नक्की.....

त्रिविक्रम शेंड्ये 
(२८ जुन २०१४ )


Wednesday, September 17, 2014

माझी लैला !

"ती "

तशी आमची पहिली नजरभेट झाली ती साधारण: मी तिसरीत असताना, म्हणजे सुमारे ३3 वर्षांपूर्वी, ....
'मुंज झालेला बटू' म्हणून 'दाखवायला' मला घेऊन आजोबा गेले होते त्या घरात मी तिला पहिल्यांदा पाहिली, सावळी काय ? कचकचीत काळी होती ती.... पण त्या काळेपणांत पण एक रुबाब होता, मी 'काळी' आहे असं म्हणू नका.. काळी असले तरी "मी" आहे.. असा रुबाब...
खानदानी !!
पहिल्या भेटीतच मी तिच्या प्रेमात पडलोय हे लक्षात यायचं... ते वय अज्जिबात नव्हतं, लक्षात आलं ते ४/ ५ वर्षानंतर... ते सुद्धा "तिच्या" बद्दल माझ्या वयाचेच माझे मावस भाऊ, बोलत असत तेंव्हा... त्या वयातल्या चर्चा सुद्धा "तिच्या" नखरयांच्या असायच्या.. तीचं रूप, रंग, ऐटदार नाकातली ती ताऱ्याची चमकी... ती म्हणे त्यांच्या खानदानाची निशाणी... सगळ्यांच्या नाकात तश्शीच असते.. डिझाईन बदलत नाहीत..
"ती" चालायला लागली की लोकं तिला वाट करून द्यायचे... ती पुढे गेली की तिला जाताना पाठमोरी चाल पाहण्यातच धन्यता मानायचे... जणूकाही 'गज गामिनी'
अशा चर्चा झाल्या की वाटायचं २५ पैसे तास भाड्याची सायकल घेऊन त्या घरासमोरून चकरा माराव्या... पण ते घर खूप लांब, परत ती खानदानी.. अशी रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्याला थोडीच दिसणार ती ?? मग लक्षात यायला लागलं की आपण तिच्या प्रेमात पडलोय चक्क.... मीच काय तिच्या बद्दल भरभरून माहिती सांगणारा माझा मावसभाऊ सुध्धा..
.....
वर्ष उलटत होती.. जसा जसा मोठा होत होतो तशी तिच्या बद्दल ... तिच्या घराण्यांबद्दल माहिती कळत होती... तिच्या प्रेमात अजूनच पडत होतो...
साधारण ८ वी/ ९वीत असताना तिला परत बघितलं.. तोच रुबाब.. तीच ऐट... देखणेपणात आणखी भर... ( तो आधीपासूनचं होता.. पण माझ्या लक्षात आता येत होतं...)
धीर करून मी तिला केलेला पहिला स्पर्श.. आणि हाताला जाणवलेली तिची ती उबदार थरथर.....बस्स.... कलीजा खलास झाला....
....
वर्षामागून वर्ष जात होती... आजोळी गेलो की तिची चौकशी.. तिची ख्यालीखुशाली कळतेय का ते बघणं... हिम्मत करून स्वत: विषय काढून चौकशी करणं अशी प्रगती चालू होती.... ती मात्र तशीच.. ऐटदार खानदानी....

वाढत्या वयाबरोबर.. कामाबरोबर मी पण दुसरीत गुंतून गेलो.. तिच्या खानदाना सारखीच , पण तिच्या समोर "गावठी" ठरणारी बरोबर संसाराला लागलो .. पण पहिलं प्रेम कसं विसरायचं ?
...
नात्यातल्या एका लग्नाला जायचं ठरल्यावर धीर करून आई ला म्हणालो .... ती येणार आहे ना ? मला आवडलीय ती...
आई फक्त हसली... तुला नाही रे झेपणार ते "प्रकरण" (आपली ऐपत बघून हात पाय पसरावेत....) ..... त्या लग्नाला ती पण आली होती, माझं "ध्यान" लांब आहे बघून मी हळूच तिच्याकडे गेलो.. लोकांची पर्वा न करता ... परत ती थरथर अनुभवली.. निशब्द थरथर.......
.
हल्ली तिच्या सारख्या दिसणांऱ्या खूप आहेत.. तिच्या पेक्षा टंच... मदमस्त ... पण तीचं खानदानीपण वेगळंच .... त्याची सर ह्या बाकीच्या भवान्यांना नाही....

... आज अचानक परत ती समोर आली... माझ्या प्रमाणे तीचं पण वय वाढतंय..., नाकातली चमकी थोडी निस्तेज झालीय.. पण रुबाब तोच...
तुम्हाला कदाचित ती ( १९५९) म्हातारी वाटेल , पण माझ्या साठी ती "स्वीट १६" आहे. मित्रानो... मी तिच्या आकंठ प्रेमात बुडालोय.... आणि म्हणतात ना..

" लैला को देखिये मजनू की नजरों से... "

मनमोहनजी....तुम्हारा जरा चुक्याच........

मनमोहनजी ,
आज तुम्ही तुम्हाला मिळालेली अखेरची संधी घालवलीत.....
तुम्हाला आणि साऱ्या देशाला माहीत आहे की आजचं तुमचं भाषण हे लाल किल्ल्यावरून केलेलं शेवटचं भाषण आहे.... म्हणतात नां, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही .... मग या संधीचा फायदा घेऊन तुम्ही खरं तर तुमच्यावर दबाव टाकणाऱ्या व्यक्तींना देशासमोर आणायला हवं होतं, तसं ते आम्हाला काय, जगातल्या प्रत्येकाला माहीत आहे.. पण म्हणतात नां.. "फ्रॉम हॉर्सेस माऊथ ....असो.. आजचं तुमचं भाषण तरी कुठे तुम्ही स्वत: लिहिलं होतत ? तुम्ही फक्त ते वाचून दाखवलंत.....
अहो, आपल्या मुलाची १०० % चूक आहे हे माहीत असताना सुद्धा पैलवान बाप शेजाऱ्याला दमबाजी करतो, आणि तुम्ही आजही पाकिस्तानचा फक्त दोन चार वाक्यात गुळमुळीत निषेध केलात ? माणसाचा एवढा हळू आवाज 'शेजारच्या' घरात पकडला' गेल्यावर पण नसतो, तुम्ही तर शेजाऱ्याला तुमच्या घरात पकडला म्हणून दम देत होतात नां ? की तुमच्यात दम नाही हे हळू आवाजात सांगत होतात ? काही ऐकू आलं नाही... एवढे कोणत्या दगडाखाली हात आहेत तुमचे ? ह्या असल्या वागण्याने चुकीचे संदेश जातात, काळ सोकावतो...(राज्य मोडकळीला आलेल्या एका रशियन नेत्यांनी खरी परिस्थिती जगापासून लपवून १ में ला सर्व भांडवलशाही देशांना "बूट" उगारून दाखवला होता, आठवतं का ? अशी हिम्मत हवी.... )
"भारत निर्माण" च्या बाकीच्या जाहिराती टी.व्ही वर परत परत बघायला मिळतील, पण आजची तुम्ही केलेली जाहिरात नाही... अहो गेल्या १० वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं असतं, तर गेल्या ६६ वर्षाचा कॉंग्रेसचा संपादित इतिहास( शास्त्री, पटेल, तुम्ही अर्थमंत्री होतात तेव्हाचे पंतप्रधान नरसिंहराव यांची नावं वगळलीत तुम्ही, म्हणून संपादित म्हणालो) सांगत बसला नसता तुम्ही...कॉंग्रेसचा नाही, गांधी घराण्याचा अहवाल वाचलात तुम्ही...
एकीकडे तुमचे ते गुजराथी "संताजी घोरपडे " ( दिसतात नां तुम्हा सगळ्यांना ते जळी-- स्थळी --- ) त्यांनी गुजरात मध्ये १० वर्षात काय काय केलं ते सांगत होते.... आणि तुम्ही अख्ख्या कॉंग्रेसने काय केलं ते वाचत होतात.... " सांगे पूर्वजांची कीर्ती तो एक ........" २०१४ नंतर भरपूर वेळ आहे, तेंव्हा दासबोध वाचा.......
त्यांच्या सर्व भाषणातील आकडेवारी खोटी असते, असं तुमचे सर्व हुशार प्रवक्ते खुर्शीद मामू, डॉग्गीराजे ( मला "दिग्गी" का लिहिता येत नाही ? हा कीबोर्डचा प्रोब्लेम आहे!! ) म्हणत असतात, मग जरा कष्ट घेऊन तुमच्या म्याडमनी सीबीआय मार्फत गुजरातची गेल्या पाच वर्षाची तरी खरी आकडेवारी का काढून दिली नाही ? ती वाचून तरी त्या 'फेकू' एक्सप्रेसला आज लाल किल्ल्यावरून लाल बावटा दाखवता आला असता. पण ते " एकदम टंच माल" म्हणण्या इतकं सोप्प आहे का ? तेंव्हा सांभाळून, 'हिरवा झेंडा' प्रेमाने जवळ घेऊन जोराने हलवाल आणि 'फेकू एक्सप्रेस' जास्ती जोरात येईल दिल्लीकडे...
भाषणात एक क्षण तर मी मुंबई मंडईचे बाजारभाव ऐकतोय असं वाटलं.. २ रू किलो..३ रू. किलो... काय हो, इतकी स्वस्ताई आहे सगळीकडे तर आमदारांची पेन्शन का २५००० वरून ४०००० केली ? की ते पेन्शन डॉलर च्या किमतीवर अवलंबून आहे ? हाताबरोबर १० वर्षातले डॉलरचे बदललेले( म्हणजे फक्त चढलेले) भाव पण वाचून दाखवायचे.. असो..
ती 'स्पेशल स्कील अक्वयार प्रमोशन' ची घोषणा नक्की कोणासाठी आहे हो ? पांढऱ्या शुभ्र कांजी केलेल्या कपड्यांनी डोक्यावर रिकामं घमेलं घेऊन 'कष्ट' करणारयांच्या स्कील साठी ? किती पैसे बाजूला काढलेत इलेक्शन फंडातून ? असल्या 'अवार्ड'ला (की लाचेला ? ) भुलून युवापिढी कॉंग्रेसकडे आकर्षित होईल ? बुडत्याचा पाय खोलात ....
तुम्हाला ती स्वत:च्या मुलाला पायाखाली घेऊन स्वत:चा  जीव वाचवणांरी माकडीणीची गोष्ट माहीत आहे का ? 
२०१४ ला त्या गोष्टीत थोडा फरक होणार आहे, तुम्हालाला पायाखाली घेऊन एक आई तिच्या  मुलाचा जीव वाचवणार आहे, तेंव्हा पाणी नाकापर्यंत यायची वाट बघू नका, आधीच हौद फोडायचं बघा....
गेली १० वर्ष आम्ही राजकारणामुळे एक उत्तम अर्थतज्ञ गमावला असा समज आहे, निदान त्याला तडा जाऊ देणार नाही अशी आशा ठेवू का ?
वेताळ कथेसारखं "तुम्हाला उत्तर माहीत असून दिलं नाहीत तर डोक्याचे १०० तुकडे ...." वगैरे म्हणायची पण सोय नाही,तुमचं तोंड उघडायला 'केजीबी' ला सुद्धा जमणार नाही...
( बघा, मी तुम्हाला निवृत्ती नंतरचा दुसरा व्यवसाय सुचवतोय......)
वंदे मातरम !!!

त्रिविक्रम शेंड्ये 
( फेसबुक - १५ ऑगस्ट २०१3 )