Wednesday, September 17, 2014

मनमोहनजी....तुम्हारा जरा चुक्याच........

मनमोहनजी ,
आज तुम्ही तुम्हाला मिळालेली अखेरची संधी घालवलीत.....
तुम्हाला आणि साऱ्या देशाला माहीत आहे की आजचं तुमचं भाषण हे लाल किल्ल्यावरून केलेलं शेवटचं भाषण आहे.... म्हणतात नां, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही .... मग या संधीचा फायदा घेऊन तुम्ही खरं तर तुमच्यावर दबाव टाकणाऱ्या व्यक्तींना देशासमोर आणायला हवं होतं, तसं ते आम्हाला काय, जगातल्या प्रत्येकाला माहीत आहे.. पण म्हणतात नां.. "फ्रॉम हॉर्सेस माऊथ ....असो.. आजचं तुमचं भाषण तरी कुठे तुम्ही स्वत: लिहिलं होतत ? तुम्ही फक्त ते वाचून दाखवलंत.....
अहो, आपल्या मुलाची १०० % चूक आहे हे माहीत असताना सुद्धा पैलवान बाप शेजाऱ्याला दमबाजी करतो, आणि तुम्ही आजही पाकिस्तानचा फक्त दोन चार वाक्यात गुळमुळीत निषेध केलात ? माणसाचा एवढा हळू आवाज 'शेजारच्या' घरात पकडला' गेल्यावर पण नसतो, तुम्ही तर शेजाऱ्याला तुमच्या घरात पकडला म्हणून दम देत होतात नां ? की तुमच्यात दम नाही हे हळू आवाजात सांगत होतात ? काही ऐकू आलं नाही... एवढे कोणत्या दगडाखाली हात आहेत तुमचे ? ह्या असल्या वागण्याने चुकीचे संदेश जातात, काळ सोकावतो...(राज्य मोडकळीला आलेल्या एका रशियन नेत्यांनी खरी परिस्थिती जगापासून लपवून १ में ला सर्व भांडवलशाही देशांना "बूट" उगारून दाखवला होता, आठवतं का ? अशी हिम्मत हवी.... )
"भारत निर्माण" च्या बाकीच्या जाहिराती टी.व्ही वर परत परत बघायला मिळतील, पण आजची तुम्ही केलेली जाहिरात नाही... अहो गेल्या १० वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं असतं, तर गेल्या ६६ वर्षाचा कॉंग्रेसचा संपादित इतिहास( शास्त्री, पटेल, तुम्ही अर्थमंत्री होतात तेव्हाचे पंतप्रधान नरसिंहराव यांची नावं वगळलीत तुम्ही, म्हणून संपादित म्हणालो) सांगत बसला नसता तुम्ही...कॉंग्रेसचा नाही, गांधी घराण्याचा अहवाल वाचलात तुम्ही...
एकीकडे तुमचे ते गुजराथी "संताजी घोरपडे " ( दिसतात नां तुम्हा सगळ्यांना ते जळी-- स्थळी --- ) त्यांनी गुजरात मध्ये १० वर्षात काय काय केलं ते सांगत होते.... आणि तुम्ही अख्ख्या कॉंग्रेसने काय केलं ते वाचत होतात.... " सांगे पूर्वजांची कीर्ती तो एक ........" २०१४ नंतर भरपूर वेळ आहे, तेंव्हा दासबोध वाचा.......
त्यांच्या सर्व भाषणातील आकडेवारी खोटी असते, असं तुमचे सर्व हुशार प्रवक्ते खुर्शीद मामू, डॉग्गीराजे ( मला "दिग्गी" का लिहिता येत नाही ? हा कीबोर्डचा प्रोब्लेम आहे!! ) म्हणत असतात, मग जरा कष्ट घेऊन तुमच्या म्याडमनी सीबीआय मार्फत गुजरातची गेल्या पाच वर्षाची तरी खरी आकडेवारी का काढून दिली नाही ? ती वाचून तरी त्या 'फेकू' एक्सप्रेसला आज लाल किल्ल्यावरून लाल बावटा दाखवता आला असता. पण ते " एकदम टंच माल" म्हणण्या इतकं सोप्प आहे का ? तेंव्हा सांभाळून, 'हिरवा झेंडा' प्रेमाने जवळ घेऊन जोराने हलवाल आणि 'फेकू एक्सप्रेस' जास्ती जोरात येईल दिल्लीकडे...
भाषणात एक क्षण तर मी मुंबई मंडईचे बाजारभाव ऐकतोय असं वाटलं.. २ रू किलो..३ रू. किलो... काय हो, इतकी स्वस्ताई आहे सगळीकडे तर आमदारांची पेन्शन का २५००० वरून ४०००० केली ? की ते पेन्शन डॉलर च्या किमतीवर अवलंबून आहे ? हाताबरोबर १० वर्षातले डॉलरचे बदललेले( म्हणजे फक्त चढलेले) भाव पण वाचून दाखवायचे.. असो..
ती 'स्पेशल स्कील अक्वयार प्रमोशन' ची घोषणा नक्की कोणासाठी आहे हो ? पांढऱ्या शुभ्र कांजी केलेल्या कपड्यांनी डोक्यावर रिकामं घमेलं घेऊन 'कष्ट' करणारयांच्या स्कील साठी ? किती पैसे बाजूला काढलेत इलेक्शन फंडातून ? असल्या 'अवार्ड'ला (की लाचेला ? ) भुलून युवापिढी कॉंग्रेसकडे आकर्षित होईल ? बुडत्याचा पाय खोलात ....
तुम्हाला ती स्वत:च्या मुलाला पायाखाली घेऊन स्वत:चा  जीव वाचवणांरी माकडीणीची गोष्ट माहीत आहे का ? 
२०१४ ला त्या गोष्टीत थोडा फरक होणार आहे, तुम्हालाला पायाखाली घेऊन एक आई तिच्या  मुलाचा जीव वाचवणार आहे, तेंव्हा पाणी नाकापर्यंत यायची वाट बघू नका, आधीच हौद फोडायचं बघा....
गेली १० वर्ष आम्ही राजकारणामुळे एक उत्तम अर्थतज्ञ गमावला असा समज आहे, निदान त्याला तडा जाऊ देणार नाही अशी आशा ठेवू का ?
वेताळ कथेसारखं "तुम्हाला उत्तर माहीत असून दिलं नाहीत तर डोक्याचे १०० तुकडे ...." वगैरे म्हणायची पण सोय नाही,तुमचं तोंड उघडायला 'केजीबी' ला सुद्धा जमणार नाही...
( बघा, मी तुम्हाला निवृत्ती नंतरचा दुसरा व्यवसाय सुचवतोय......)
वंदे मातरम !!!

त्रिविक्रम शेंड्ये 
( फेसबुक - १५ ऑगस्ट २०१3 )

No comments:

Post a Comment