Tuesday, September 23, 2014

अन्न हे पूर्णब्रह्म !!

1988 चा मे महीना , 
नेपाळमधल्या पोखरा व्हॅली ट्रेकचा दुसरा दिवस, 
शेड्यूल प्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी 2 वाजताच पोचलो आणि ग्रुपलिडर म्हणाला दिवस मोठा आहे, अजून पुढच्या गावात मुक्काम करू.... 
निघालो आणि पावसाला सुरूवात झाली ... 
4.30/5.00 वाजता पुढच्या नदी काठावर गावाच्या खुणा दिसू लागल्या आणि हूश्श वाटलं.....
 पण कसलं काय ? 87मधल्या पावसाळ्यात पुर आल्यावर सरकार ने सगळी वस्ती ऊठवली होती... शिल्लक होते फक्त मोडके चौथरे... 
परत सॅक पाठीवर मारून पुढच्या गावाच्या रस्त्याला लागलो ... 
रात्री 8.30च्या दरम्यान छोटी वस्ती लागली, तिथे चौकशी केली तर ट्रेक हटस् ( ट्रेकर्सच्या मुक्कामाची सोय) असलेलं गाव अजून 2 तासांनी आहे, ताकद आणि तयारी कोणाचीच नव्हती, मग याच वस्तीत मुक्काम करावा असं ठरलं, तर कोणीही जागा देइना, पावसाची रिपरिप, आतपर्यंत भिजलेले कपडे, घोट्या पर्यंत चिखलात जड झालेले हंटर्स, आणि गारठलेले पाय घेऊन 16 जण थंडीत कुडकुडत ऊभे.. पोटात आग पडलेली.... 9.00 - सव्वा नऊ म्हणजे गावात अपरात्र .. 
पाऊस वाढल्यावर मी एका घराच्या पडवीत जाऊन ऊभा राहीलो आणि आतून त्या घराच्या लक्ष्मीचा चढलेला आवाज आला 'कौन है.... 
 मी (वय वर्षे 15,) आणखी कुडकुडत म्हणालो..''दिदी थंड है...बुखार आएगा '' दार थोडं किलकिलं झालं ... बाई दरवाजात आली माझ्याकडे न बघता परत गेली आणि मी आत गेलो... ती ' राक्षी ' ( तांदूळाची बनवलेली घरगुती दारू) पित बसली होती, नवरा चुलीशी होता... असो..
ऊंटाला अरबाच्या तंबूत प्रवेश मिळाला होता !!
10 मिनिटं झाली आणि माझी 'तब्येत' बघायला बिनाताई आत आली, दिदीचा आवाज परत चढला, पण पाकीट काढल्यावर मग रात्री निदान 4 मुलींना आत घेण्याची मांडवली झाली ... 5 जणं शेकोटीशी बसलो..
अजून एक ग्लास संपल्यावर तिनंच विचारलं ...खाना खाया ? नही ..खाओगे ?? हां .
मेन्यू आणि रेट ठरवायला आजून दोघे आत आले...शेकोटीत दोन नवी लाकडं सारली... 
सिर्फ डाल चावल मिलेगा .. मेन्यू फायनल झाल्या वर तिने नवीन बाटली काढली, नवर्.याला सांगून उरलेल्या लोकांची रहायची व्यवस्था दुसरी कडे केली, पैसे मात्र कनवटीला लावले आणि बैठक मारून बसली... मी आणि नारायण (तिचा नवरा) पोटमाळ्यावरून फ्लॉवर बटाटे घेऊन ऊतरलो...हिने चार बटाटे ठेवून ऊरलेले परत बसल्या जागेवरून माळ्यावर भिरकावले... तांदूळ रेशनिंग करून झालं... नवरा तिला हळू बोलायला सांगत चूल फूंकत होता..मोठ्या पातेल्यात भात शिजत होता... तिने बैठकीखालून सुरा काढून फ्लॉवर कापायला घेतला... 4 बटाटे, पानं, देठं आणि नावाला थोडा फ्लॉवर साकटून पातेल्यात.....ऊरलेला परत माळ्यावर! !!
11.00 - 11.30 च्या दरम्यान सगळं प्रकरण निट रटरटलं ...अचानक परत तिचा आवाज चढला.. नारायण ने लोणचं काढलं होतं.. तिला न जुमानता वाढलं पण.... 
लोणचं .... आणि फ्लॉवर बटाट्याचं भाताबरोबर शिजवलेलं ते रसायन...
आहाहा... 
त्या दिवसापासून 'अन्न हे पुर्णब्रह्म' हे स्वतःच्या मनावर ठसवलं आहे !! 
...त्रिविक्रम शेंड्ये
( १९ ऑगस्ट २०१४ )

2 comments:

  1. खरंच अश्या वेळी अन्नाची किंमत कळते खरी, लेखन झकास!

    ReplyDelete
  2. तुझा ब्लॉग आहे हे आजच कळलं... असो.. भन्नाट लिहीलंय

    ReplyDelete